भोवरा

भाग-१


“ थांब, बस इथे, मला बोलायचं.” मनिषा सोफ्यावरून पुढे सरकत म्हणाली. दरवाजातून येता येता कैवल्य थबकला.
“आई, आपण नंतर बोलू शकत नाही का?” हाताशी चाळा करत तिच्याकडे न पहाताच तो म्हणाला.
“नाही, हे आत्ताच बोलायला हवयं. बस.” रोखलेल्या नजरेने तिने कैवल्यला इशारा केला.
“ मी थकलोय, प्लीज.” ताडकन पाय उचलून तो निघून गेला.दरवाजा आपटल्याचा धाडकन आवाज आला.राग आणि हताशपणाने उसासे टाकत मनिषाने घट्ट डोळे मिटुन घेतले. तिच्या चेहऱ्यावर वेदनेची रेषा स्पष्ट दिसत होती.
कैवल्यने खुर्चीत बॅग टाकून दिली. गादीवर पडून तो फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक पहात राहिला. गोल गोल गोल..हे चक्र असणं अव्याहतपणे सुरू राहणार.मनिषा काय बोलणार हे त्याला ठाऊक होतं. इतके दिवस ती आडून आडून विचारायची. पण आता समोर बसूनच काय तो सोक्षमोक्ष लावायचा अस तिनं ठरवलं होतं. कैवल्यची तयारी नव्हती. ‘आपण फारच तिरसट वागलो का? असं वागायला नको होत,’मनाशीच विचार करत कैवल्य कितीतरी वेळ पडून होता.


मनिषा.

तरुणपणी बऱ्याच सामाजिक संस्थांमध्ये काम करायची. मोठी लोभस पोरं. लांबसडक पाठीवर रूळणारी केस, चोपून नेसलेली कॉटनची साडी करारीपणा ओतप्रोत भरलेला. माधवशी लग्न झाल्यानंतर बऱ्याच गोष्टींना मर्यादा येत होती. माधव ऑफिसमधून आल्यावर गॅलरीत सिगारेट ओढत बसायचा.फार कमी बोलणं.मनिषाची घुसमट होत होती. त्यात अनिच्छेने दिवस राहिले. कैवल्य झाल्यावर तरी तो बदलेल अशी आशा होती पण तीही फोल ठरली. कैवल्य दोन वर्षाचा झाल्यानंतर एक दिवस माधव अचानक निघून गेला. कुठे, काय काहीही न सांगता. पोलिसांत तक्रार करूनही काहीच हाती आलं नाही.
दोन तीन महिने असेच गेल्यानंतर मनिषाने कंबर कसली‌.ज्याने कधीही आपल्या भावनांची कदरच केली नाही त्यांच्यासाठी अश्रू ढाळूनही काय उपयोग.

एकवेळ भांडून माणूस काही संवाद साधतो. त्याच्या अस्तित्वाची जाणीव तरी असते. पण मौनात धुंद असलेल्या माणसाला वाचा कशी फोडणार?

झालं ते ठीक झालं. असं मानून ती उठली. एका ठिकाणी कंपनीत नोकरी करायला लागली. कैवल्यला सांभाळण, कोडकौतुक करणं, आधीच्या संस्थांमध्ये काम करणं तिचं आयुष्य आता कुठे सुरळीत चाललं होतं.


दारावरच्या बेल ने मनिषाची तंद्री भंग पावली. डोळे चोळत तिने दरवाजा उघडला. दारात धारा उभी.
“ काकू, झोपमोड केली का?”
“नाही गं, ये आत ये. बसल्या जागी डोळा लागला.सात वाजले तरी कळलंच नाही.” धारा आत आली. मनिषा तोंडावर पाणी मारून चहा ठेवायला निघून गेली.
“काकू, कैवल्य आहे का गं? बाहेर गाडी तर दिसतेय त्याची,?” कोचावरची मासिकं चाळत ती म्हणाली.
“रुममध्ये असेल ग. पहाते का? आण बोलावून. सगळ्यांना चहा आणि नाश्ता करते.” मनिषा उत्तरली.


धारा वर आली. तिने दरवाजा वाजवला. बऱ्याच वेळाने कैवल्यने दार उघडलं. त्याच्या कानपिचक्या घेत तिने विचारलं,
“काय अंधारात बसलाय? आज आपण सगळे भेटणार होतो. विसरलास का?” त्याला ढकलून ती आत आली.
कैवल्यने आळस दिला. तोंड धुवून तो तिच्यासमोर बसला.
“चल खाली. काकू वाट बघतेय चहासाठी.” त्याला हाताला धरून ओढत ती खाली आली.

कैवल्य अपराध्यासारखी मान खाली घालून बसला. मनिषा चहा आणि गरम गरम उपमा घेऊन आली.
“कैवल्य, बिस्कीट देऊ का?” मनिषा ने विचारलं.
त्याने मानेनेच नकार दिला.चहापाणी झाल्यावर ते दोघे बाहेर निघून गेली. मनिषा तिच्या कामात गुंतून गेली.
रात्री बऱ्याच उशीराने कैवल्य घरी आला. चावीने दार उघडून तो आत आला. मनिषा केव्हाच झोपी गेली होती. त्याच ताट किचनवर झाकून ठेवलं होतं. त्याला मनोमन वाटलं, आईशी आज असं वागायला नको होतं.


बाबांचा चेहराही त्याला आठवत नव्हता. तेव्हापासून आईचं त्याची बाबा झाली होती. कुठे ही काही कमी पडत नव्हतं.पण चार सहा महिन्यांपासून फारच ताण निर्माण झाला ‌होता. याची सुरुवात नक्की कशापासून झाली? केव्हापासून? आईने लग्नासाठी पिच्छा पुरवल्यानंतर? धाराला आपल्यापासून मैत्रीपेक्षा अधिक काही हवं आहे हे जाणवल्यावर की विक्रांतचा तो गोरा देखणा चेहरा आठवत राहिल्यावर. ?? त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. तो मटकन कोचावर बसला.


परिस्थिती समाजविरोधी असल्यावर किती संघर्ष करावा लागतो ना? आधी समाजाविरुद्ध ,घटनेविरुद्ध ,घरच्यांसोबत, इतकंच काय स्वत:चा स्वत:शी. हा स्वतःचा संघर्ष मोठा वेदनादायी आणि कठीणही. दोन ध्रुवावर हेंदकाळणाऱ्या दोन भिन्न मनांना समतोल साधत बांधून ठेवण किती कठीण! त्यातही पाय न घसरता तितक्याच ताकदीने उभा राहणं हे ही दिव्यच..

क्रमशः

Leave a comment