आम्ही लग्नाळू

वय वर्ष २५-३२. प्रत्येकाचा संवेदनशील, धडपडीचा आणि खडतर काळ. करिअर, बिझनेस, कर्जपाणी, स्थैर्य या सगळ्यांचा गुंता. यातून प्रत्येक जण वाट काढत असतो. यात ज्वलंत प्रश्न म्हणजे ‘लग्न.’ त्यातही अरेंज मॅरेज असेल तर अजून डोकेदुखी. या फेजमधून जाताना भयानक मानसिक ताण तणावाला सामोरं जावं लागतं. काळं बदलतोय तशी लग्नपद्धती बदललेली नाही. अनेक स्वानुभव, इतरांचे अनुभव यातून काही निष्कर्षाप्रती आलेय. त्यावर हा ब्लॉग.

” कुठे आहेस ? अर्जंट भेटायचयं. उद्या पहाटे निघणार आहे.” संध्याकाळी मित्राचा फोन.

“क्लिनीकलाच आहे. पेशंट चालू आहेत. आठला भेटू. इकडेच ये.” एकंदरीत अर्जंट या विषयाचा अंदाज मला आला होता.

“बरं. हे दोघेही आहेत. त्यांना घेऊन येतो. भेटू बाय.”

आम्ही चौघे वयाच्या सहा वर्षांपासून मित्र.एकंदरीत एकमेकांना चांगलेच ओळखणारे.

आठच्या सुमारास तिघेही आले. तणावपूर्ण शांतता. चौघेही लग्नाच्या वयाचे. समदुःखी. हल्ली आम्ही भेटलो तरी या दडपण आणणाऱ्या विषयावरचं बोलतो.

मीच शांतता भंग करत विचारलं.

” बोल. काय झालं ? लग्न?”

“बघ ना यार..काय फालतुगिरी आहे. पुढच्या महिन्यात दोन एक्झाम आहेत. आणि घरच्यांनी लग्नसाठी स्थळ बघायला सुरुवात केली.”

“मग ?? तुझं काय म्हणणं ? त्यांचं काय म्हणणं?”

” त्यांचं म्हणणं आहे बघून तरी घे.प्रोसेस सुरूवात करू. प्रोसेस सुरुवात केली तर आता म्हणे मुलीला भेटून घे. ती मुंबई, मी सांगली. कसं शक्य आहे? त्यात वीकेंड पुण्यात. किती धावपळ. किती ओढाताण.परिक्षेचं टेंशन.”

“बरं ठीकेय. एक टेंशन संपव.भेटून बघ. कुठेतरी एकवाक्यता हवी.”

“मान्य. सगळं मान्य. पण भेटून काय सांगू? परीक्षेच्या निकालानंतर माझं भविष्यच बदलेल. आता नोकरी इथे आहे उद्या कुठे माहित नाही. यात पाच सहा महिन्यांचा कालावधी जाईल. त्यात एकमेकांत गुंतलो बोलण्यातून आणि तिच्या किंवा माझ्या इच्छेविरुद्ध काय झालं तर ??”

मी निरुत्तर.

” त्याही पेक्षा. कमावती नोकरी सोडून ती येणार का सगळीकडे माझ्यासोबत?? तिने कधीच न पाहिलेल्या खेड्यांमध्ये तिला जमेल का रहायला??”

“या गोष्टी तू स्पष्ट बोल असं मला वाटतं.”

“यार..इतक्या ढीगभर मैत्रिणींशी बोलताना काही वाटलं नाही. इथे प्रचंड दडपण आहे म्हणून तुला भेटतोय. साधारण काय बोलावं काय प्रश्न विचारावे तुला वाटतं ?”

“तुझ्या अपेक्षा सांगाव्यातं.”

“दिसणं, रहाणं याबाबत कोणतीच अट नाही. पण माझं‌ सार्काझम, माझे जोक तिला सविस्तर उलगडून सांगायला लागले तर माझ्यासारखा दुर्देवी मीच.”

आमचा एकच हशा पिकला. कायम हसतमुख आणि भन्नाट विचार करणाऱ्या मित्राची तगमग जाणवत होती.

दुरचा नातेवाईक. अतिशय हुशार. चांगल्या ठिकाणी चांगल्या पगारी नोकरी. परिस्थिती सामान्य. आर्थिक स्थिती बदलावी म्हणून प्रेम वैगेरे फंदात न पडता आधी उच्चशिक्षण पूर्ण. दिसायला सावळा. चार वर्षे लग्नासाठी स्थळे पहात होता. आधी दिसण्यावरून रिजेक्शन नंतर घरात शिकलेले नाहीत म्हणून रिजेक्शन. बऱ्याच मॅट्रिमोनी साईटवर शोधमोहीम सुरू. बोलणं व्हायचं तेव्हा त्याची मानसिकता किती खच्ची झालेली ते समजायचं. इतक्या चांगल्या स्वभावाच्या मुलाला रिजेक्ट होताना पाहून वाईट वाटायचं. तू अरेंज मॅरेज मध्ये पडू नको,मला सांगायचा. अपेक्षांची लिस्ट कमी करत करत शेवटी मुलगी मिळावी यावर तो थांबला.घरच्यांच जबरदस्त प्रेशर. लग्न झालं. विचारांचा समतोल नाही, म्हणून लग्न करुनही तो सुखी नाही. दोष कुणाला देणार?

कॉलेजची मैत्रिण. दिसायला सुंदर. थोडीशी वेंधळी. शिकता शिकता स्थळ आलं. चांगलं स्थळ हातच जाऊ नये, म्हणून घरच्यांनी मनवायला सुरुवात केली. सहा सात महिने तगादा लावल्यावर तिने नाईलाजास्तव होकार दिला. अट फक्त मुलाला लग्नाआधी एक दोनदा भेट व्हावी. एक दोनदा भेट झाली. तिला निष्कर्षाप्रत येताच आलं नाही. लग्न झालं. उच्चशिक्षित असूनही विचारांचा अभाव. कुरबुरी. लगेच मूल व्हायला हवं म्हणून दबाव. मूल झाल्यावर सगळं ठीक होईल म्हणून माहेरच्यांचा आग्रह. सातव्या महिन्यात नवऱ्याने पोटावर लाथ देऊन मारहाण केली. परिणीती प्रीमॅचुअर डिलीव्हरी. मेंटल हॅरासमेंट केस… डिव्होर्स. अवघ्या दीड वर्षात होत्याच नव्हतं. आयुष्यावर सिंगल पेरेंटची आणखी जबाबदारी.

फारसं स्वातंत्र्य नसलेल्या घरातली एक मैत्रीण. प्रचंड आर्थिक सुबत्ता. पण तितकीच मर्यादेत रहाण्याचं वागण्याचं लावलेलं लेबलं. मोठ्या घरातील मोठ स्थळ. लग्न ठरलं. मोठ्यांच्या वाटाघाटी झाल्या. मुलामुलींची पसंती वडिलधाऱ्या लोकांनीच ठरवली. लग्नानंतर भौतिक सुखात रमण्यावाचून तिला पर्याय नाही.

उच्चशिक्षित मुलगी. पोस्ट ग्रॅज्युएट डॉक्टर. अरेंंज मॅरेज साठी स्थळ पहाणं. तेच पारंपरिक पद्धतीने साडीत मुलांसमोर बसणं,प्रश्र्नांची उत्तरं देणं. त्यानंतर मुलांची रिजेक्शन. कारण कधी उच्चशिक्षित, कधी दिसायला देखणी नाही, कधी पत्रिका किंवा आणखी काही. पंधरा वीस नकारानंतर ती डिप्रेशनमध्ये. लग्न जमत नाही म्हणून घरच्यांची कटकट, अजून जमत नाही म्हणून उंचावलेल्या भुवया, यात तिच्या मनाची कल्पना न केलेली बरी.

जवळ राहणारी एकजण.‌हल्ली बऱ्याचदा चिडचिड करत असते.‌लग्नसंस्थेवरचा विश्वास उडाल्याचं सांगते. मुलीला ॲडजस्ट करावचं लागतं यावर ती भडकते. मी मनाने समाधानी असेल असा नवरा शोधा तिची अट. कोणाचाही स्वभाव लग्नाआधी कळत नाही, हे वडाची साल पिंपळाला लावून उत्तर. या विषयावर बोलायला सुद्धा ती तयार होत नाही. ती आगावू आहे, असं आसपासच्या लोकांचं म्हणणं.

माझ्या बरोबरीच्या, माझ्या नात्यातल्या अनेक मुलामुलींच्या या लग्नाला धरून बरीच मतमतांतरे आहेत. दिसायला अप्सरा हवी, रुबाबदार देखणा लाखांमध्ये कमावणारा नवरा हवा..अशा अपेक्षा असणारे महाभागही भेटले.टक्कल आहे, काळी दिसते, स्वतःचं घर नाही, गाडी नाही यासारखी बरीच कारणं रिजेक्शन मधून समोर आली. त्यात घरच्यांसोबत होणारे क्लॅशेस वेगळेच.

नकार पचवणं सगळ्यात जास्त औघड असतं. त्यातही एखाद्या गोष्टीचा दबाव असताना नकाराला सामोर जाणं अतिशय कठीण.

आपल्या भारतीय समाजमानसिकतेमध्ये निरोगी किंवा हेल्थी मेंटल स्टेट याबाबत फार कमी जागरूकता दिसते. आधी पाल्याकडून असणाऱ्या प्रचंड अपेक्षा, इतर मुलामुलींसोबत तुलना, अभ्यासात गती नसेल तर त्याचं जीवन किती व्यर्थ आहे, अशाप्रकारची तुलनात्मक अवहेलना आजही तितकीच मूळ धरून आहे. वाढलेली स्पर्धा, त्यातून स्वतःचं वेगळेपण टिकवून ठेवण्यासाठी धडपड ह्या आजकालच्या तरुणांमध्ये आव्हानात्मक गोष्टी दिसून येतात. नोकरीच्या ठिकाणी असणारे प्रचंड टेन्शन, मिळणाऱ्या (गरजेपुरते/कमी) पगारात कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्याची कसरत ही मानसिक तणावाची कारण अधोरेखित होतात. यातून येणारे डिप्रेशन, वाढणारे शारिरीक आजार तसचं व्यसनाधीनता ह्याच मूळ समस्यांची उपाय होणं गरजेचं वाटतं. भरीत भर फक्त नोकरी लागली म्हणून लग्नाचा तगादा लावणारे पालक आणि नातेवाईक यांची मला कीव वाटते. एक जबाबदारी पेलली की उसंत न घेता दुसरी जबाबदारी हजर. त्यासाठी मनाची तयारी किंवा सर्वदृष्ट्या मुलगा किंवा मुलगी तितकी सक्षम आहे का, हे पालक विचारात घेत नाही. सरसकट नियम लावणं ही एक फार चीड येणारी बाब समाजात दिसून येते. मुलगी ठराविक वयाची झाली, शिक्षण झालं की तिचं लग्न झालं पाहिजे असा अलिखित नियम तयार झालाय. तू मुलगी आहेस, थोडंफार तुला ॲडजस्ट करावचं लागणार, हे आजही सर्रास ऐकायला मिळतं. उच्चशिक्षित झाली म्हणजे ती ऐकणार नाही, हाताबाहेर जाईल. स्वतःची मतं मांडेल, अशा विचाराने मुलीला नकार देणारी अनेक मुलं पाहिली आहेत. लग्न अशा पद्धतीने हवं, मानपान असा हवा, लग्नात कपडे काय असावेत यावरूनही जमलेली लग्न मोडलेली पहाण्यात आलेली आहेत.

मुलाची काय किंवा मुलीची काय दोन्हींकडून अपेक्षांची यादी संपतच नाही. आधी एक दोन‌वर असणारी यादी मग हजारो बारीकसारीक गोष्टी वर येऊन थांबते. मुलीने असंच वागावं, अशा प्रकारे रहावं या गोष्टी आधीपासून लादल्या जातात. मुलांचं पॅकेज विचारून त्यावरून लग्न जमवणारे आणि त्यावरून मुलगी सुखी राहिलं हे ठामपणे सांगणारे लोक पाहिले की माझी मती गुंग होते. देखणेपणा, पैसा, संपत्ती, सामाजिक स्तर या गोष्टींवर लग्न जुळवताना त्यावेळी तितकाच वेळ मुलाला आणि मुलीला दिला तर त्यांचं आयुष्य अधिक सुखकर होईल असं कायम वाटत रहातं. नातेवाईक, शेजारी पाजारी यांचा या निगेटिव्ह मानसिकतेत भर टाकायचा प्रयत्नच दिसून येतो. तिचं लग्न झालं म्हणजे मोठी जबाबदारी टळली अशी काही मानसिकता त्यांची असते. वय किती, किती स्थळं आली, रिजेक्ट होण्याची (स्वत:हून तयार केलेली) कारणं, आता लग्न झालं पाहिजे म्हणून चार चौघात पालकांना सुनावणारे महाभाग यांनी आपणही कधीतरी या प्रक्रियेमधून जाणार आहोत याचं भान ठेवलेलं बरं ! या ठराविक वयात लग्न झालं पाहिजे ( मानसिकता असो वा नसो) हेच आपलं फार मोठं दुखणं आहे. आणि यासाठी सगळ्यांनीच साचेबंद विचारसरणी तून बाहेर यायला हवं.

प्रश्न पुन्हा मानसिकतेवरच येऊन थांबतो. आखून दिलेल्या चौकटीतच समाधान मानण्याची सवय झालेली आहे. अशा एका विशिष्ट पद्धतीने प्रक्रिया झाली पाहिजे. त्यात समाज काय म्हणेल, मोठे काय म्हणतील या गोष्टींच विनाकारण ओझं बाळगल जातं. जनरेशन गॅप वाढत रहातो. मग तोच ताणतणाव त्याच मानसिकता..या सगळ्यांपेक्षा आपल्याला काय वाटतं, ही गोष्ट महत्त्वाची. सरतेशेवटी आपण सगळे मानसिक सुख शोधत असतो.

लग्न ही शारीरिक संबंधाला दिलेली कायदेशीर मान्यता या पलीकडे आजही डोकावून पाहिलं जातं नाही. दोन मनांपेक्षा दोन सामाजिक समस्तर यांचं मिलन जास्त वाटत रहातं निगेटिव्ह थिंकिंग या मानसिकतेतून समाजाने बाहेर पडणं गरजेचं वाटतं. सुदृढ आणि निरोगी मानसिकतेसाठी चर्चा व्हायला हव्यात. त्यातून पॉझिटिव्ह आऊटकम यायला हवा. मत मांडणं, मांडू देणं, मतांचं आदर करणं त्यावर चर्चा करून योग्य निर्णय घेणं हेच अभिप्रेत वाटतं. डोळ्यांवरची झापड काढून या लग्नप्रक्रियेत अधिक पारदर्शक पणा आणला पाहिजे.

अरेंज मॅरेज या प्रक्रियेच्या मी अजिबात विरोधात नाही. परंतु ज्या दोघांना लग्न करायचे आहे, त्या दोघांना या प्रक्रियेत पुरेसा वेळ दिलाच जात नाही. त्यातून लग्नानंतर उद्भवणारे वाद, कौटुंबिक अस्वास्थ्य, जबाबदाऱ्या पेलण्यात आलेलं अपयश आणि आता वाढलेल्या घटस्फोटांचं प्रमाण पहाता या अरेंज मॅरेज मध्ये बेसिक कम्युनिकेशन ही फार मोठी गरज आहे. बऱ्याच लोकांनी बोलल्यानंतर या खालील गोष्टी पालकांच्या निदर्शनास आणून द्याव्या वाटतात.

१. प्रॉपर्टी, पैसा या बाहेर जाऊन शिक्षण आणि आवड या कॉलमवर अधिक भर द्यायला हवा. (अर्थात आपल्या मुलीला/मुलाला आर्थिक बाबतीत कोणती अडचण येऊ नये हे प्रत्येक पालकाला वाटते. परंतु त्यासाठी कोणतीही तडजोड करत पाल्याची मानसिकता बिघडू देणं अयोग्य.)

२. रंग, रुप, बाह्य सौंदर्याच्या चौकटीबाहेर आजही बरेचजण जात नाही. केवळ फोटो पाहून रिजेक्ट करणारे थोर लोक आहेत. त्यापेक्षा आलेली मुलगी/ मुलगा स्वभावानुसार आपल्या कुटुंबाला योग्य आहे का हे पहायचं सर्वांच्या हिताचं.

३. मुलाची/मुलींची योग्य चौकशी करावी, सहमत. परंतु ती चौकशी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात नुकसान करणारी नको. ( मुलीच्या सोशल प्रोफिईलमध्ये सर्वांत जास्त कमेंट करणारे लोक शोधून त्यांच्याकडे चौकशी करण अतिशयोक्ती वाटतं.)

४. आपल्या मुलाला/मुलीला कोणत्या प्रकारचा जोडीदार हवा, हे आधी नीट लक्षात घ्यावं. कल घ्यावा. उगाचंच तुला काय कळतं, तुला जास्त ओळखतो, तुझं चांगलं वाईट कळतं अशा प्रकारचे खोचक उत्तरं देऊन मनाविरुद्ध लग्न करणं आणि नंतर आयुष्यभर त्या गोष्टींचा पश्चाताप करणं चूक. प्रत्येकाची आयुष्यात एका पातळीवर प्रचंड मानसिक कुचंबणा होत असते. प्रत्येक वेळी ती व्यक्त होत नाही. वेळ द्या.

५. कुटुंबापेक्षा व्यक्तिगत पातळीवर ते दोघे पुरक असतील तर कुटुंब स्वास्थ राहिल.

बऱ्याचदा लग्नाविषयी स्वत:चीच मत स्पष्ट नसतात. आपला पार्टनर कसा असावा, अपेक्षा काय याचं उत्तर आपल्याकडं असावं. पार्टनर (सगळ्या अपेक्षा पूर्ण होतं नाही ) अपेक्षेच्या जवळपास जाणारा असावा. भरमसाट स्थळ बघून नकार देऊन घेऊन डिप्रेस होण्यापेक्षा आपल्या अपेक्षांच्या जवळ जाणारीच स्थळ बघण चांगलं आहे. नकार देताना कारण सुस्पष्ट हवी. बऱ्याचदा भूतकाळातील गोष्टींचा वर्तमानात नाहक संबंध लावून तणाव‌ निर्माण केला जातो. गैरसमज, शंका-कुशंकांच योग्य वेळी निरसण केल तर भविष्यात होणारे ताणतणाव टाळता येऊ शकतात. स्पेस द्या, स्पेस घ्या. जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तोपर्यंत यात न पडलेलचं बरं. शेवटी प्रत्येकाला पार्टनर हवाच असतो. तो योग्य वेळी योग्य विचाराने मिळायला हवा..!!

– डॉ.निशिगंधा दिवेकर

©All rights reserved.

Image source-google.